सांगली : RPI Chief Ramdas Athawale | लोकांनी जर ठरविले तर नेते एकत्र येऊ शकतात. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) बरखास्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) आरपीआय पक्षाची धुरा स्वतःच्या हातात घ्यावी. ते जर महायुतीमध्ये येण्यासाठी तयार असतील तर मी त्यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्षपद आणि केंद्रीय मंत्रीपद सोडण्यासाठी तयार आहे, अशी खुली ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (RPI Chief Ramdas Athawale) यांनी दिली आहे. आठवले हे सांगली दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, आम्ही सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून काम करून पक्ष वाढवत आहोत. पण काही लोकांनी पक्षाचे नाव बदलून आपले राजकारण सुरू केले. बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष चालवायचा असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणले पाहिजे.
रामदास आठवले पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारके पूर्ण केली आहेत. त्यामुळे ते संविधान बदलतील, अशी अफवा पसरविण्याचे काही कारण नाही. अशी अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न कुणी करू नये.
रामदास आठवले (RPI Chief Ramdas Athawale) पुढे म्हणाले, ऐक्य खालच्या पातळीवरही झाले पाहीजे. जनतेला माझे आवाहन आहे की, फक्त नेत्यांना दोष देऊ नका. गावागावात आपण एकत्र आहोत का? स्थानिक पातळीवर अनेक संघटना असतात. एका नेत्याच्या पाठिमागे उभे राहण्याची मानसिकता लोकांमध्ये नाही. संघटना स्थापन करून लगेच राष्ट्रीय नेता होण्याची अहमिका समाजात दिसते.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना रामदास आठवले पुढे म्हणाले, ७० वर्ष काँग्रेसने (Congress) भारत फोडला होता का? आताच भारत जोडो करण्याची परिस्थिती का आली? तुम्ही कितीही यात्रा काढत राहा, पण काँग्रेसला यश मिळेल, अशी परिस्थिती अजिबात नाही. त्यांनी प्रयत्न करत राहावे, पण जनता पुन्हा भाजपालाच निवडून देईल.
आगामी निवडणुकांबाबत आठवले म्हणाले, २०२४ च्या निवडणुकांमध्ये ४०४ च्या पुढे जागा मिळतील. सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर एनडीएसोबत असल्याने माझ्या पक्षाला राज्यात दोन तरी जागा द्याव्यात. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार येताच आमचा विसर पडला. मुंबई, सोलापूर अथवा विदर्भात आरपीआयला जागा देण्यात यावी यासाठी प्रयत्न करत आहे.